दिलेल्या वेळेनुसार सुरक्षेची योग्य खबरदारी घेऊन दुकाने सुरु ठेवण्याचे निर्देश
हिंगोली,दि.14: जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना (कोव्हीड-19) हा विषाणू मूळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषीत केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात तसेच महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 रोजी पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतूदी नुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याबाबतची नियमावली तयार करण्यात आलेली आहे. त्याशिवाय भारत सरकार आरोग्य मंत्रालय, महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालय यांनी जाहीर केल्या प्रमाणे कोरानाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात लोकांनी येवू नये, तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमाचे आयोजन केल्यास या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्वसामान्य जनतेस व त्यांचे आरोग्यास धोकादायक होत आहे. त्याकरिता तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक आहे. अशी उपाययोजना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 खालील तरतुदींच्या अनुषंगाने जनतेस, खालील व्यक्ती, आस्थापना यांना उद्देशून आदेश काढण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून, खबरदारीचा उपाय म्हणुन हा निर्णय घेण्यात आला आहे.
सद्यपरिस्थीती विचारात घेता अत्यावश्यक सेवेमध्ये भाजीपाला, किराणा सामान खरेदीकरीता नागरिक दररोज मोठ्या प्रमाणावर एकत्र येत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी हिंगोली जिल्ह्याच्या संपुर्ण भागामध्ये खालील तक्त्यात दर्शविण्यात आलेल्या वेळेनुसार सुरक्षेची योग्य खबरदारी घेऊन सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
भाजीपाला विक्रेत्यांनी भाजीमंडीत भाजीपाल्याची विक्री न करता संबंधित तालुक्याचे तहसिलदार व मुख्याधिकारी यांनी ठरवुन दिलेल्या ठिकाणी खालीलप्रमाणे नमुद दिवशी व वेळी भाजीपाला विक्री करु शकतील. तसेच संबधीत मुख्याधिकारी यांनी ओळखपत्र देण्याची कार्यवाही करावी. भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन ग्राहाकामध्ये एक मिटरचे अंतर राहील यांची दक्षता संबधीत भाजीपाला विक्रेत्यांनी घ्यावी. ग्राहकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करावी. तसेच किराणामाल विक्रेत्यांनी देखील खालील नमुद दिवशी व वेळेतच किराणामालाची विक्री करावी. माल खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन ग्राहकामध्ये एक मिटरचे अंतर राहील यांची दक्षता संबधीत किराणा माल विक्रेत्यांनी घ्यावी. तसेच ग्राहकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करावी.
अ.क्र. | दिनांक | वार | वेळ |
|
1 | 15/04/2020 | बुधवार |
सकाळी 09.00 ते दु.1.00 वाजेपर्यंत
| |
2 | 17/04/2020 | शुक्रवार | ||
3 | 19/04/2020 | रविवार | ||
4 | 21/04/2020 | मंगळवार | ||
5 | 23/04/2020 | गुरुवार | ||
6 | 25/04/2020 | शनिवार | ||
7 | 27/04/2020 | सोमवार |
| |
8 | 29/04/2020 | बुधवार |
|
सामान खरेदीसाठी नागरिकांना पायी जावे लागणार आहे. त्यांना दूचाकी, तीन चाकी व चारचाकी वाहनांचा वापर करता येणार नाही.
आदेशात दिलेल्या कालावधी वगळता इतर कालावधी कोणासही घराच्या बाहेर पडता येणार नाही. अत्यावश्यक तसेच अपरिहार्य परिस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती नियंत्रण कक्षाचा क्र. 02456-222560 वर किंवा टोल फ्री क्र. 100 वर संपर्क करावा. तसेच संचारबंदी कालावधी मध्ये परवानगी घेतलेल्या व्यक्ती शिवाय इतर कोणतीही व्यक्ती रस्त्याने बाजार मध्ये, गल्ली मध्ये घराबाहेर फिरतांना आढळुन आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड सहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल. उपरोक्त ठिकाणे/कार्यक्रम येथील संबंधित आयोजक तसेच आस्थापना मालक/चालक/व्यवस्थापक यांना प्रत्येकास आदेशापूर्वी स्वतंत्र नोटीस बजावणी शक्य नसल्याने याबाबतची माहिती प्रसार माध्यमे, उप विभागीय दंडाधिकारी, तालूका कार्यकारी दंडाधिकारी, पोलीस स्टेशन, सर्व जि. हिंगोली यांचे नोटीस बोर्डवर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
****