रेशनवर काळाबाजार; भुजबळांनी दिला दणका


महाराष्ट्रावर ओढवलेल्या करोना संकटाचा मुकाबला करत असताना राज्य सरकार सर्व आघाड्यांवर अहोरात्र काम करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व मंत्री आपापल्या विभागांची जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत. या संकटात आरोग्य विभागानंतर जीवनावश्यक वस्तूंशी निगडीत असलेल्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागावर मोठी मदार आहे. ही जबाबदारी अनुभवी मंत्री छगन भुजबळ चांगल्याप्रकारे बजावत आहेत. राज्यात सर्वत्र अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नियोजन करत असतानाच काळाबाजार करणाऱ्यांना तसेच या संकटाचा गैरफायदा घेऊन ग्राहकांना लुबाडणाऱ्यांनाही भुजबळांना दणका दिला आहे. भुजबळांच्या या धडाकेबाज कामाचं कौतुकही होत आहे...


करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील एकही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागावर जोखमीची जबाबदारी आहे. या काळात नागरिकांना अन्न धान्य वाटपाची जबाबदारी स्वस्त धान्य दुकानदारांवर असून रेशन धान्य वाटप करताना अनियमितता तसेच नियमांचे पालन न केलेल्या राज्यातील एकूण ३९ रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ८७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आहे तर एकूण ४८ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. तसेच यापुढेही स्वस्त धान्य दुकानांमध्ये काळाबाजार वा वाटप करताना कमी धान्य देणे किवा जास्त पैसे घेणे तसेच नियमांचे पालन केले जात नसेल तर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराच राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.


नागपूर विभागात ५ गुन्हे दाखल-



राज्याच्या नागपूर महसूल विभागात एकूण ५ गुन्हे नोंदविण्यात आले असून १८ रेशन दुकानांचे निलंबन तर १ दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. नागपूर विभागात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक ११ दुकानांवर निलंबित करण्याची कार्यवाही झालेली असून त्या खालोखाल वर्धा ४ दुकानांवर कार्यवाही झालेली आहे. रेशन दुकान रद्द केल्याची एकमेव कार्यवाही नागपूर शहर भागात करण्यात आली असून चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विविध तक्रारींच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे. धान्याच्या पुरवठ्यात कोणताही अडथळा येता नये, हे धोरण स्वीकारून ही कारवाई होत आहे. भुजबळांनी वेळोवेळी आढावा बैठकी घेत वितरणाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला.


रेशन दुकानदार हादरले-



अमरावती महसूल विभागात एकूण ५ गुन्हे नोंदविण्यात आले असून ७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले तर १३ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. अमरावती विभागात अकोला जिल्ह्यात सर्वाधिक ३ दुकानांवर निलंबित करण्याची कार्यवाही झालेली असून ५ दुकानांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही वाशीम जिल्ह्यात करण्यात आलेली आहे. तर त्या खालोखाल बुलडाणा जिल्ह्यात ४ दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक प्रत्येकी २ गुन्हे अमरावती व अकोला जिल्ह्यात दाखल करण्यात आलेले असून त्या खालोखाल बुलडाणा जिल्ह्यात १ गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या कारवाईने रेशन दुकानदार चांगलेच हादरले आहेत.


औरंगाबाद, नाशकातही दणका-



औरंगाबाद महसूल विभागात २९ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले असून ४ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक १२ रेशन दुकानांवर तर त्या खालोखाल उस्मानाबाद जिल्हात ५ रेशन दुकानांवर निलंबनाची कार्यवाही झालेली आहे. तसेच जालना आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी २ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. नाशिक महसूल विभागात एकूण १६ गुन्हे नोंदविण्यात आले असून ९ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले तर १५ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात नाशिक व जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी ३ दुकानांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात ७ तर त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात ४ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. तसेच अहमदनगर व जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी ७ रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.


पुण्यात काळाबाजार करणाऱ्यांवर मोठी कारवाई



पुणे महसूल विभागात एकूण ४ गुन्हे नोंदविण्यात आले असून १७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले असून १४ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. पुणे विभागात सर्वाधिक पुणे जिल्ह्यात ११ दुकानांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात ८ रेशन दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आले असून पुणे जिल्ह्यात ३ दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोकण महसूल विभागात एकूण ९ गुन्हे नोंदविण्यात आले असून ७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले आहे. तर १ दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. कोकण विभागात सर्वाधिक ठाणे जिल्ह्यात ४ रेशन दुकाने निलंबित करण्यात आले रत्नागिरी जिल्ह्यात १ रेशन दुकानाच परवाना रद्द करण्यात आला आहे. तसेच ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक ४ गुन्हे तर त्या खालोखाल रायगड जिल्ह्यात ३ दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.


***