मुंबई :- कोरोनाच्या या संकटकाळात येत्या १ मे या तारखेला म्हणजे महाराष्ट्र दिनी राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर शासकीय कार्यालयात सकाळी आठ वाजता एकाच वेळी ध्वजारोहण होणार असून या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी,जिल्हा पोलीस अधिक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचीच उपस्थिती असावी. यांच्या शिवाय इतर कोणालाही निमंत्रित करू नये असे आदेश राज्याचे अवर सचिव आर. जी. गायकवाड यांनी दिले आहेत.
दरवर्षी, कामगारांचा विशेष सत्कार १ मे या महाराष्ट्र आणि कामगार दिनी केला जातो. तसेच महाराष्ट्र राज्याच्या स्थापने निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, कवायत घेण्यात येते मात्र या वर्षी कोरोना या महामारीमुळे राज्यात संचार बंदी लागू करण्यात आली आहे. तसेच केंद्रसरकार द्वारे लॉकडाऊन देखील ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे १ मे रोजी राज्यात कोणताच कार्यक्रम करणे शक्य नाही.
दरम्यान,राज्यात ध्वजारोहण करण्यात येणार आहे. मात्र त्यावेळी संचार बंदीच्या नियमांचे उल्लंघन होऊ नाही याची दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे. या संदर्भातील माहिती राज्यपालांच्या पत्रात देण्यात आली आहे. असे सकाळ या दैनिकाने दिलेल्या वृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे.
***