कोरोनाशी लढा – केंद्राला जमले नाही ते आता काँग्रेस करणार !


स्थलांतरित मजुरांकडून ट्रेन तिकिटाचे पैसे घेण्याच्या मुद्दावरुन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.


"कामगार आणि मजूर हे आपल्या देशाच्या प्रगतीचे दूत आहेत. जेव्हा आपले सरकार परदेशात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी मोफत हवाई प्रवासाची व्यवस्था करते, गुजरातमधल्या एका कार्यक्रमासाठी वाहतूक आणि भोजनासाठी १०० कोटी रुपये खर्च करते, रेल्वे मंत्रालयाकडून पीएम करोना फंडाला १५१ कोटी रुपयांची देणगी दिली जाते, मग प्रगतीचे दूत असलेल्या स्थलांतरित मजुरांना या कठिण काळात मोफत रेल्वे प्रवास का करु दिला जात नाही" असा सवाल सोनिया गांधी यांनी केला आहे.


कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर सर्वाधिक फटका बसला आहे तो स्थलांतरीत मजूर आणि कामगारांना… लॉकडाऊनच्या तब्बल दीड महिन्यानंतर केंद्र सरकारने या मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात नेण्यासाठी विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला.


पण धक्कादायक बाब म्हणजे रेल्वे प्रवास मोफत नसून त्यासाठी तिकीट लागेल अशी भूमिका रेल्वेने घेतली. गेल्या दीड महिन्यापासून या मजूर आणि कामगारांना रोजगार नाहीये, त्यांच्या हातात पैसा नसताना तिकीटाचै पैसे आणायचे कुठून असा प्रश्न या मजुरांपुढे उभा राहिला आहे.


पण आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या मजुरांच्या तिकीटाचा खर्च काँग्रेस करणार असल्याची घोषणा केली आहे. काँग्रेसच्या सर्व राज्यांमधील प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्यांनी तातडीने यासंदर्भात गरजू मजूरांना मदत करावी आणि त्यांच्या तिकीटाची सोय करण्याचे आदेश सोनिया गांधी दिले आहे.
***