सोमवार नियम आणि अटींसह एसटी महामंडळ या सर्व लोकांना इच्छित स्थळी मोफत पोहोचवणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबतची माहिती दिली.
मुंबई : लॉकडाऊनमुळे राज्यभरात अडकलेले नागरिक, विद्यार्थी, पर्यटक आणि मजुरांसाठी लालपरी अर्थात एसटी मदतीला (Free ST Bus Service) धावली आहे. नियम आणि अटींसह एसटी महामंडळ या सर्व लोकांना इच्छित स्थळी मोफत पोहोचवणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबतची माहिती दिली.
मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यात अडकलेले विद्यार्थी, मजूर, नातेवाईकांकडे गेलेल्या व्यक्ती अशा आपापल्या जिल्ह्यात सोडण्याची व्यवस्था प्रशासनाकडून (Free ST Bus Service) करण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोन वगळता बाकी सर्व ठिकाणच्या प्रवाशांना एसटीने प्रवास करता येणार आहे.
यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला मदत आणि पुनर्वसन विभागाकडून आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे संचारबंदीमुळे राज्यात अडकलेले नागरिक आपापल्या जिल्हयात जाऊ शकतील. यासाठी मोफत एसटी बस सेवा पुरवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, या प्रवासासाठी प्रशासनाने काही नियम आणि अटी घातल्या आहेत.
काय आहेत एसटी प्रवासाचे नियम?
* एका एसटी बसमध्ये एकावेळी 22 जणांचा ग्रुप प्रवास करु शकेल.
* या 22 जणांच्या ग्रुप लीडरला पोलीस स्टेशन आणि ग्रामीण भागात जिल्हाधिकारी किंवा तहसीलदाराला प्रवासाच्या परवागनीसाठी अर्ज करावा लागेल.
* प्रवाशांना आधार कार्ड किंवा अधिकृत ओळखपत्र दाखवत स्वतःची ओळख द्यावी लागेल.
* प्रवासादरम्यान प्रवाशाला मास्क लावणे अनिवार्य असेल
एसटी बसमध्ये एका एका सीटवर एकच प्रवासी बसेल .
* पॉईंट टू पॉईंट सर्व्हिस असेल, एसटी रस्त्यात इतर कुठेही थांबणार नाही.
* लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवासांनी स्वतःचे अन्न सोबत घ्यावे
एसटी बस वाटेत ढाबा किंवा हॉटेलवर थांबणार नाही.
* प्रवाशांनी फक्त एसटी डेपो आगारातील स्वछता गृहाचा वापर करावा.
* कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना प्रवासाची परवागनी नाही.
****