नवी दिल्ली: करोना लॉकडाऊनमुळे सर्वात जास्त प्रभावीत झालेल्या प्रवासी मजूरांसाठी मोठा निर्णय आज केंद्र सरकारने जाहीर केला. या निर्णयामुळे देशातील ८ कोटी प्रवासी मजूरांना पुढील दोन महिने मोफत अन्न धान्य दिले जाणार आहे. पुढील दोन महिने प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ आणि एका कुटुंबाला एक किलो डाळ दिली जाईल. यासाठी ३ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे.
केंद्र सरकारने २० लाक कोटी रुपयांचे विक्रमी पॅकेज जाहीर केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी ही माहिती दिली. हे मोफत अन्न धान्य कोणाला द्यायचे याचा निर्णय राज्य सरकारला करावा लागणार आहे. ही योजना राज्य सरकारच्या माध्यमातून राबवली जाणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
याचा देशातील ८ कोटी प्रवासी मजूरांना फायदा होईल जे दुसऱ्या राज्यात राहतात आणि त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही.
एक देश, एक रेशन कार्ड -
देशातील २३ राज्यातील ६७ कोटी लोकांचा समावेश 'एक देश, एक रेशन कार्ड' या अंतर्गत करण्यात आला आहे. यामुळे देशातील ८३ टक्के लोकांकडे रेशनकार्ड आहे. ही योजना ऑगस्ट २०२० पासून लागू केली जाणार आहे. मार्च २०२१ पर्यंत सर्वांना या योजनेमार्फत जोडले जाणार असून त्यामुळे देशातील कोणत्याही व्यक्तीला अन्य राज्यात त्याच्या वाटणीचे धान्य मिळू शकले.
मोदी सरकारने तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणली आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची बचत झाल्याचे राज्य अर्थमंत्री अनुराग ठाकूर म्हणाले. एक देश एक रेशन कार्ड ही योजना क्रांतीकारी असून यामुळे देशातील कोणतीही व्यक्ती स्वस्त सरकारी रेशन दुकानातून त्याच्या वाटणीचे धान्य घेऊ शकेल. याचा सर्वात जास्त फायदा प्रवासी मजूरांना होईल.
***