मुंबईतून देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यास अखेर राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे उद्यापासून मुंबईतून रोज २५ विमानांचं टेकऑफ आणि लँडिंग होणार आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
मुंबई: मुंबईतून देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यास अखेर राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे उद्यापासून मुंबईतून रोज २५ विमानांचं टेकऑफ आणि लँडिंग होणार आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
मुंबईतील करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने उद्यापासून मुंबईतून सुरू होणाऱ्या देशांतर्गत विमानसेवेला परवानगी नाकारली होती. मात्र, आज झालेल्या बैठकीत मुंबईतून देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मुंबईच्या विमानतळावर देशांतर्गत विमानांचं टेक ऑफ आणि लँडिंग होणार आहे. तसेच दररोज २५ विमानांचं उड्डाण करण्यात येणार असून हळूहळू ही संख्या वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. तसेच विमान उड्डाणाबाबतची नवीन नियमावली लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सकाळी मुंबईहून विमानसेवा सुरू करण्यास विरोध दर्शविला होता. विमानसेवेमुळे करोना रुग्णांची ये-जा होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. त्यावर मलिक यांनी ते त्यांचं व्यक्तिगत मत असल्याचं सांगितलं. राज्यात बसेस आणि इतर वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विमानसेवेला सुरुवात होण्यास काहीच अडचण नसावी, असंही ते म्हणाले.
दरम्यान, राज्य सरकार २५ विमानांचे दररोज उड्डाण होणार असल्याचं सांगत असले तरी विमान कंपन्यांना अद्याप नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून कोणतीही सूचना आलेली नाही. विमानतळ हा केंद्राचा विषय असल्याचं मतही विमान कंपन्यांनी व्यक्त केलं. मात्र, उद्या मुंबईहून ६४ उड्डाणासाठी बुकिंग सुरूच असल्याचं कंपन्यांनी सांगितलं.
***