धक्कादायक बातमी - औरंगाबादजवळ भीषण अपघात, रेल्वेखाली चिरडून १६ मजूर ठार, २ जखमी


लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळं स्थलांतरित मजुरांना दिलासा मिळाल्याचे वाटत असताना हृदय पिळवटून टाकणारी एक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. बदनापूर ते करमाडदरम्यान एका मालगाडीखाली चिरडून १६ स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला आहे.


औरंगाबाद'करोना'च्या संकटाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना आज औरंगाबादमध्ये घडली. गावाकडे जाणारी गाडी पकडण्यासाठी रेल्वे रुळांवरून निघालेल्या स्थलांतरित मजुरांना एका मालगाडीनं चिरडल्यानं १६ मजूर जागीच ठार झाले आहेत. तर, दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवानं तिघांचे प्राण वाचले आहेत.


बदनापूर-करमाड दरम्यान आज सकाळी सहा वाजता हा भयंकर अपघात झाला. सर्व १९ मजूर हे जालन्यातील एसआरजे कंपनीत काम करणारे होते. लॉकडाऊन सातत्यानं वाढत असल्यामुळं त्यांनी घराकडं जाण्याचा निर्णय घेतला. मध्य प्रदेशला जाण्यासाठी भुसावळला रेल्वे गाडी मिळेल अशी माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार ते पायी भुसावळला चालले होते. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी ते रेल्वे रुळांवरून जात होते. रात्र झाल्यामुळं सटाणा शिवाराजवळ रेल्वे रुळावरच पथारी पसरून ते झोपी गेले. पहाटेच्या सुमारास जालन्याकडून औरंगाबादकडे धडधडत येणाऱ्या मालगाडीचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे सर्वजण मालगाडीखाली चिरडले गेले. यात १६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले. हे सर्व मजूर मध्य प्रदेशचे आहेत.


जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर, इतरांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.


अपघातग्रस्त रेल्वे गाडी नांदेडहून मनमाडला पेट्रोल-डिझेल घेऊन निघाली होती, अशी माहिती औरंगाबादचे रेल्वे स्टेशन मॅनेजर अशोक निकम यांनी दिली आहे.


***