उद्धव ठाकरे बिनविरोध आमदार होणार नाही, काँग्रेसने घेतली वेगळी भूमिका


काँग्रेसने दोन उमेदवार लढवण्याच्या भूमिका घेतल्यामुळे 21 मे रोजी विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार नाही.


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या विधान परिषदेची निवडणुकीबद्दल हालचालींना वेग आला आहे. विधान परिषद निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता होती. पण, काँग्रेसच्या भूमिकेनंतर विधान परिषद बिनविरोध होणार नाही  हे आता जवळपास निश्चित झालं आहे.


विधान परिषदेसाठी एकूण 9 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यात शिवसेना 2, राष्ट्रवादी - 2, काँग्रेस - 1 आणि भाजप 4 उमेदवार दिले तर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता होती. पण,  काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री  बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस 2 जागा लढवणार असं स्पष्ट केलं आहे.


महाविकास आघाडी 6 उमेदवार रिंगणात उतरवणार आहे.  6 उमेदवार निवडून आणण्याची महाविकास आघाडीची क्षमता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला आहे.


काँग्रेसने दोन उमेदवार लढवण्याच्या भूमिका घेतल्यामुळे 21 मे रोजी विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार नाही. 9 जागासांठी आता १० उमेदवार रिंगणात येणार असल्याने प्रत्यक्ष मतदान होणार हे आता निश्चित झालं आहे.


दरम्यान,  विधान परिषद बिनविरोध व्हावी अशी शिवसेना आणि राष्ट्रवादीची इच्छा होती. परंतु, महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादीवर  दबाव वाढवला.   याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात  मंगळवारी रात्री बैठक झाली. परंतु,  विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसकडून जास्तीची जागा लढायची की नाही याबाबत तोडगा निघाला नाही.


राष्ट्रवादी पक्षाला राज्यसभेला फौजिया खान, तर आता विधान परिषदेमध्ये शिवसेनेकडे मतांचा आकडा नसतानाही एक जागा जास्त लढवत आहे, हा मुद्दा काँग्रेसनं बैठकीत उपस्थितीत केला होता.  त्यामुळे  दोन जागा लढण्यासाठी काँग्रेस आग्रही होती.


काँग्रेस-राष्ट्रवादीतून कुणाची नावं आहेत चर्चेत?


तर दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाकडून विधानपरिषद निवडणूक उमेदवारीसाठी हेमंत टकले, अमोल मिटकरी, रुपाली चाकणकर या इच्छुकांची नाव चर्चेत आहेत, तर काँग्रेस पक्षाकडून मोहन जोशी, माणिकराव ठाकरे , नसिम खान, मुजप्फर हुसेन यांची नाव चर्चेत आहेत.


राष्ट्रवादीत सु्प्रिया सुळे या त्यांच्या निकटवर्तीय रूपाली चाकणकर, आदिती नलावडे यांची वर्णी लागावी यासाठी प्रयत्नशील तर अजित पवार हे अमोल मिटकरी, नजीम मुल्ला यांच्या नावासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.


शिवसेनेकडून दोन नाव निश्चित-


तर, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडून जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद आमदारकी अर्ज भरण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांची लगबग सुरू झाली आहे. शिवसेनेकडून उद्धव  ठाकरे आणि प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांची नावं विधान परिषदेसाठी निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.


मुंबई, ठाणे, रायगड या मतदार संघातील शिवसेनेच्या आमदारांच्या उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारी अर्जावर सह्या करण्यात आल्या असल्याचं कळतंय. त्यामुळे लवकरच उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे.
***